post 56

 चार ओळी ते चारशे छत्तीस पानं एवढा पल्ला गाठला गेला.अर्थात!त्या साठी मधली बत्तीस वर्ष जावी लागली, 
या बत्तीस वर्षांनी मला भरभरून दिलं. आणि हिस्टरी रिपीट्स म्हणतात तसं 'मनोवेधस' च्या आगमनाने पून्हा तोच अनुभव दिला.
मी माझा च्या वेळी खरच मी एकटा होतो 
माझी दोन चार माणसं सोडली तर कोणी नव्हतं सोबत 
मी माझ्या च्या साध्या प्रकाशन समारंभाला शंभर माणसं आली कुठून?हा अजूनही न सुटलेला प्रश्न आहे.
त्याच दिवशी हातोहात प्रती खपल्या असत्या पण तेवढ्या प्रती हातात आल्याच नाहीत 
मनोवेधस च्या वेळी त्याहून भयंकर अनुभव!प्रकाशन समारंभ च रद्द करावा लागला कारण पुस्तक च तयार नव्हतं 
पण मग हेमंत जोशी आणि संगीता सरदेसाई दोघांनी मनावर घेतलं आणि मनोवेधस हातात आलं 
आणि परत मी माझाचा अनुभव आला 
तेव्हा वितरण वगैरेची काही कल्पना नव्हती आणि आता वितरण कुणाकडे द्यायचं कळत नव्हतं 
पण तेंव्हा ही रसिकजन पायपीट करत घरी येत होते 
आणि आता ही पून्हा तेच चित्र पहायला मिळालं 
त्या वेळी केवळ पुणेकर पाठीशी उभे राहीले आणि या वेळी ही पुणेकरांनीच पाठींबा दिला 
मी माझा नव्वद साली प्रकाशित झालं 
पण रसिकांपर्यंत पोहोचायला ९२ साल उजाडलं. कारण पुस्तक परत छापायला पैसेच नव्हते. आणि घरचे इतके उदासीन होते की छापलेलं पुस्तक गेलं ना?मग आता बास झालं असं दादांच मत होतं आणि मी माझा प्रकाशित झाल्यावर माई ला पण एकदम रिकामं रिकामं वाटायला लागलं असेल त्या मुळे ती पण जरा कोरडी वागायला लागली होती 
तशा माझ्या बहिणी मला मदत करायला तत्पर असायच्या. पण तेव्हा कुणाच्या हे लक्षातच आलं नाही
मग अचानक गोरेगाव चा अतुल जोशी भेटला. कोणी ओळख करून दिली आठवत नाही पण तो आणि त्याची बायको वैजू दोघांनी खूप प्रोत्साहन दिलं.अतुल कामाबाबत आणि हिशोबाबाबत खूप चोख होता. त्यामुळे मी माझा खरं जोरात पसरलं, अक्षरशः दाही दिशानी मागणी यायला लागली 
त्या आधी पुण्याचे पत्की आणि होनप या दोन मित्रांनी पुण्यात खूप पुस्तकं विकली मग गोवर्धन भोसलेची एंट्री झाली ज्याच्या पुस्तकाला मी प्रस्तावना दिली असा एकमेव माणूस 
इंद्रायणी प्रकाशनाने मी माझा ची जबाबदारी घेतली ती आत्ता आत्ता पर्यंत. पण मनोवेधस आलं ते नवा गडी नवा राज च्या थाटात 
पण अनुभव तसेच 
मी माझा नवं होतं तेंव्हा पुणेकरांनी दिवाळीच्या फराळापासनं ते हाताने विणलेल्या मफलर पर्यंत सगळं सप्रेम दिलं देवा समोर ठेवायचा अगदी छोटा रेखीव चांदीचा गडू आणि त्यावरचा पेला शहा बंधू नी दिला तर माझं लग्न ठरल्यावर पटवर्धन कुटुंबानी श्रेयस मधे माझं केळवण घातलं मोजून वीस माणसं होती.
फक्त एकच खंत वाटते सामान्य वृत्तीच्या माझ्या वडिलांना काही माझं हे कौतूक झेपलं नाही. "शेखरबाबू डोक्यात हवा जाऊ देऊ नका हे पालुपद ते दिवस रात्र मला ऐकवायचे कोणी आवर्जून भेटायला घरी आले की "काय त्या कवितेत इतकं आहे?कळत नाही बुवा असं तोंड वेंगाडून म्हणायचे 
तवा गरम आहे तो वर पोळी भाजून घ्या या त्यांच्या न मागितलेल्या सल्ल्याचा तर ऊबग यायचा त्या बरोबर त्यानी वाजवलेल्या टिचक्या तर जालिम असायच्या 
मुलाच्या यशानी जन्मदात्याला आनंद होतोच असं नाही
एकदा फातरफेकरांचा हात धरून पाडगावकर मला भेटायला घरी आले नेमका मी घरात नव्हतो. 
दादांनी लगेच बजावलं ही मोठी माणसं नकोत बाबा घरी काय बोलायचं आम्हाला कळत नाही. माधव गडकरी विजय तेंडुलकर सुध्दा कधी तरी डोकवायचे पण ते ही त्यांना खपायचं नाही.
एकच चूक केली की दादांच्या दबावाखाली येऊन मी तेंव्हा जाहीर कार्यक्रमाची निमंत्रणं स्विकारली. माझा बोलायची तयारी नव्हती माझा स्वभाव नव्हता आत्मविश्वास तर अजिबात नव्हता 
पण जावं लागायचं, तेंव्हा ज्यांची ज्यांची निमंत्रणं मी स्विकारली त्या  सगळ्यांची मी क्षमा मागतो .
पण मग लग्न झालं,माझं लग्न  हा घरच्यांसाठी खूप मोठा धक्का होता.तो त्याना पचवणं जड गेलं मग घर सुटणारच होतं ते घर सुटलं आणि त्या बरोबर माणसंही तुटली .
पण मग उमा सोबत नवा डाव टाकला तो रंगतच गेला. एकमेकाला हुकमी एक्का समजून आम्ही दुर्री तीर्री सत्ती अठ्ठी शी जमवतच राहीलो. होईल तो हात आमचा असायचा अजूनही असतो. 
पण ती रंगत कार्यक्रमात जाणवायला लागली आणि कट्ट्यार काळजात घुसलीच्या प्रयोगासारखे आमचे कार्यक्रम चार तास पाच तास चालायला लागले 
मग फेसबुक आलं आणि मी बहरलोच फेसबुक वरच्या मित्रानी मला लिहीतं केलं किती कथा कविता लघू कथा तुमच्या प्रोत्साहना मुळे कागदावर उतरल्या त्याचे संग्रह झाले त्याच्या आवृत्त्या झाल्या आणि  मग एकदा दाणी सरांच्या घरातल्या श्रीरामाची कथा सुचली. पण ती कथा संपेचना थांबेचना 
त्या कथेनेच मला लिहायला प्रवृत्त केलं. पहिली तीस चाळीस पानं उमाने नजरेखालून घातली आणि तिलाही त्यात राम जाणवला. आणि मी लिहीत राहीलो. लाॅकडाऊन माझ्या पथ्यावर पडला. पाडेकर सरांनी कथा वाचून पहिल्याच झटक्याला मुखपृष्ठ दाखवलं आणि कथेत नवरंग भरत गेले 
आणि हिस्टरी रिपीट्स म्हणतो तसं झालं 
पहिल्या चार महिन्यांत च आवृत्ती संपायला आली. पसंतीचे अभिप्राय आले इमेल व्हाॅट्सप च्या काळात पत्र आली. एका बाईनी कळवलं माझी सून आता ड्यू आहे, मला नातू झाला तर त्याचं नाव मनोवेधस ठेवणार, तुषार मेहेंदळे म्हणतो टेकडीच्या पायथ्याशी घर बांधून त्याचं नाव मनोवेधस ठेवणार 
गणात्रा सर म्हणतात अहमदाबाद ला त्यांच्या काॅलेजात ते मनोवेधस वर म्युरल बनवणार 
मी माझा च्या वेळी असच झालं होतं तांबोस्कर यांनी 'प्रत्येकाला एक घरटं असावं या कवितेचं दारावरचं हँडल बनवलं होतं 
ट्रक च्या मागे पुसणारं कोणी असेल तर ही कविता लिहीली गेली 
डाॅक्टर म्हसकरांनी तर त्यांच सारं फार्महाऊस मी माझ्या च्या कवितानी फुलवून टाकलं नजर जावी तिथे फुलं आणि माझ्या कविता.
आता दादा हयात नाहीत, नाहीतर त्यांनाच जाणवलं असतं 
आपण ज्याला गरम तवा समजत होतो तो तवा नाही तर रसिकांच प्रेम आहे माया आहे 
आणि ती गरम नसते खूप उबदार असते 
आपला मुलगा भाग्यवान की ही कधी नं शमणारी ऊब जन्मभर त्याला मिळणार आहे.

चंगो

....

हिरे की पहचान जोहरी को होती है  ! 🙏 सामान्य माणसाचे क्षेत्र नाही ते !

...

मुलांच्या उत्कर्षाने पालकांनाच आनंद नाही अवघडच आहे ! 😢

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .